व्हॉट्सऍप कट्टा   

स्वाभिमानाचे बंध
मान सन्मान आणि अपमान सर्व काही मिळते जीवनात |
प्रत्येकाचा वाटा किती हे लिहीले असते आपल्या नशिबात ॥
फळाची अपेक्षा न करता केले काम की, मिळतो मान |
तो मिळायला लागला की, जगण्यात मिळते समाधान॥
नकळत होणारा सन्मान देतो जगण्याला नवी भाषा |
त्याच्यामुळे बदलून जात असते आयुष्याची दिशा ॥
सन्मान मिळताना कधी कधी वाट्याला येतो अपमान |
जगाचा नियमच असा, सुख आणि दुःखाचा वाटा असतो समान ॥
जीवनात येतील मानापमानाचे प्रसंग अनेक |
मन शांत ठेवा सोडू नका विवेक ॥
- अजित भा. खाडीलकर
मो.: ९९२२२१६००७
----
खूण पटते
 
पाषाणातून ’मूर्ती’ घडते
सिद्ध-सगुणता तिथे वसते...
अलगद छिन्नी हातोड्यातून
कारागिरी सुचते मनापासून
रूप अलौकीक साकारते....
एकाग्र होतसे चंचलशी मती
चित्त, नेत्र-कर अवघे गुंतती
हळूहळू  ’रचना’  साधते....
नितांत साजिरे रूप सुंदर
भाव मनीचे निखळ मनोहर
’मधुरा’ भक्ती चरणी उतरते.....
मंदिरी शांत घंटा नांदते
चेतना अंतरी जागी करते
गाभारी तेज, खूण पटते.....
 
- कविता मेहेंदळे
मो.: ९३२६६५७०२७
---------------
शास्त्राचा उपयोग कोणता?
प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले म्हणा ना - आचार्यांनी दोघात एक पदार्थ दिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. तीन दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले.
तीन दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, ‘कामात काही अडचणी तर आल्या नाहीत?’ पहिला अभिमानाने म्हणाला, आईला ताप होता, वडील पोटदुखींना हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता; पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणलं आहे. दुसरा म्हणाला, आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात वेळ गेला. आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी.
आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, ‘रसायन शास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे, समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?’
तात्पर्य : ज्ञानाचा-शिक्षणाचा उपयोग समाजास झाला तर खर्‍या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे.
---
बंडू रोज त्या पोरीला प्रेमपत्र लिहायचा... 
अन् झाडाखाली ठेवायचा. ती पोरगी रोज ते प्रेमपत्र उचलायची....  पण कधी उत्तर देईना! बंडू इचार करी... ही पोरगी पत्र तर घेते बा.. पण उत्तर का बरे देत नाही! त्यानं विख्याला हे गोष्ट सांगतली...  विख्या म्हणे.... कोणती पोरगी. मला दाखंव बरं... दुसर्‍या दिसी बंडूनं पत्र लिवलं अन.. 
झाडाखाली नेऊन ठेवलं.. तीे पोरगी आली.. पत्र उचललं अन् घेऊन गेली! बंडूनं विख्याला ती पोरगी दाखवली 
विख्या म्हणे... आबे भैताडा... 
ती कचरा येचणारी हाय ना..!
 

Related Articles